खेळ दृश्य-अदृश्य नात्याचा
तुषारच शहरात शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी जाण्याचं स्वप्न होतं. पदवीत्तर शिक्षण पूर्ण करून तुषार शहराकडे आला. तुषार हा परिस्थितींवर मात करुन अनेक संकटांना तोंड देत आजवर त्याच्या जीवनाचा प्रवास करत आला. त्यामुळे त्याला लहानपणापासूनचं परिस्थितीसोबत जुळवून घेण्याची सवय होती. दररोज घडणाऱ्या आजूबाजूच्या घटना - प्रसंगांकडे उघड्या डोळ्यांनी बघत तो त्याच्या जीवनाचा प्रवास करत होता. मानसशास्त्र त्याच्या अभ्यासक्रमाचा विषय नव्हता पण त्याला या विषयाची खूप आवड होती. या विषयाची तो जगण्याशी संबंध जोडून रोज नवनवीन गोष्टी शिकायचा प्रयत्न करत होता. त्यामुळे तो जास्त बोलका नव्हता...समोरच्याला ऐकून घ्यायचा...खूप साऱ्या विचारधारा ऐकल्यानंतर त्यावर विचार करत असत. त्या विचारधारा आणि रोजचं जगण याचा संबंध जोडून पाहायचा. वाद-प्रतिवादांमध्ये तो फारसा पडत नसे. त्यातून दोन माणसं एकमेकांपासून दूर जातील असा वाद-प्रतिवाद किंवा संवाद टाळत असे. त्याच्या अश्या स्वभावामुळे त्याच्या अवतीभवती असणाऱ्या माणसांची त्याच्याबद्दलची मते ही बहुदा वरवरची असायची. ज्यांना तुषारची ओळख होती ते मात्र हे सर्व जाणून होते.
शहरात आल्यावर त्याची फारशी कुणाशी ओळख नव्हती. हळूहळू ओळखी वाढत गेल्या खूप सारे मित्र-मैत्रिणी होत गेले.तुषार मैत्री करण्यास अगदी थेट होता. मित्र-मैत्रिणींच्या कुटुंबांसोबतही सहज मैत्री व्हायची.
असाच एक तुषारचा अनुभव. तुषार आणि त्याचे काही मित्र-मैत्रिणी २-३ दिवसांसाठी बाहेर गेले होते. गृपने बाहेर गेले असल्यामुळे सर्वांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी तुषारवर होती. आता ग्रुपमधील सर्वच मित्र-मैत्रीणींचं एकमेकांशी असलेलं नातं हे ज्याच्या-त्याच्या स्वभावानुसार होतं. तुषारपेक्षा वयाने लहान असलेल्या एक मैत्रीण.ही मैत्रीण तशी स्ट्रेट फॉरवर्ड म्हणते पण फारशी परिस्थिती हाताळण्याची सवय तिला नाही. कधी काय रिऍक्ट होईल याचा नेम नाही. त्यामुळे तुषार आणि तिची मैत्री फक्त ग्रुप म्हणूनच राहिली. मैत्री ही वेगवेगळ्या व्यक्तींसोबत वेगवेगळी असते आणि ती दोघांच्या स्वभाव, विचार आणि ते एकमेकांच्या मतांचा आदर करून ती कशी जोपासता यावर खरं तर मैत्री फुलतं जाते. तसं तुषार आणि या मैत्रिणीची मैत्री विचार म्हणूनच होती. त्यामुळे बाहेर जाताना मुलीला २-३ दिवसांसाठी पाठवायचे तर कुणाच्यातरी जबाबदारीवर पाठवायची अशी सर्वच पालकांच्या मनात प्रश्न येतो. तसाच या मैत्रिणीच्या आईचीही होती. ती असणे साहजिकच आहे.
शहरात आल्यानंतर तुषार आणि या मैत्रिणीची आई यांच्यात चांगले कौटुंबिक नातं तयार झालं होत. मैत्रिणीपेक्षा तिच्या आई सोबत चांगली मैत्री होती असं म्हटलं तर वावघ ठरणार नाही. २-३ दिवसानंतर परत येताना रात्री खूप उशीर झाला होता. रात्रीचे ०१:३० वाजले होते. शहरात तश्या रात्रभर बस सुरूच असतात. तरी सर्वांचं असं ठरलं होतं की सर्वांनी त्या रात्री ऑफीसला जायचं आणि सकाळी आपापल्या घरी जायचं. पण ही मैत्रीण घरी जायचा आग्रह करत होती, तुषारला माहीत होतं ,'ही काय आपलं ऐकणार नाही'.मग त्याने तिच ज्या मित्रासोबत चांगलं जमत त्याला समजवायला सांगितलं पण तिने त्याचही ऐकलं नाही आणि बसने घरी गेली. बस स्टॉपपासून तिचं घर साधारण १० किमी दूर असेल. त्यामुळे रात्रीची वेळ असल्यामुळे केवळ मुलगी आहे म्हणूनच नाही तर इतर अनेक कारणांनी तिने एकटं घरी जाणं बरोबर नव्हतंच.
दुसऱ्या दिवशी सकाळीच त्या मैत्रिणीच्या आईचा ज्या मित्राला तुषारने समजवायला सांगितलं होत त्याला कॉल आला. असा फोन कॉल येईल याची तुषारला जाणीव होतीच. कॉल आला तेव्हा तुषार आणि तो मित्र सोबत होते, त्यामुळे त्या मित्रांने स्पीकर ऑन केला. त्या मित्राला खूप बोलल्या त्यांचं बोलणं आई म्हणून बरोबरच होत. त्या मित्रामधील आणि मैत्रिणीच्या आईमधील संवाद जो तुषारला ऐकायला आला तो:-
●मैत्रिणीची आई :- तुम्ही सर्वजण एकत्र बाहेर गेला होता मग माझ्या मुलीला तुम्ही रात्री ऐकट घरी पाठवलं कसं??
●मित्र :- हो आमचं चुकलंच आम्ही तिला एकटीला घरी जाऊ द्यायला नको होत. पण ती ऐकायला तयार नव्हती.
●मैत्रिणीची आई :- अरे मी तू होतास म्हणून तुझ्या भरवस्यावर माझ्या मुलीला बाहेर पाठवले होते.इथे तुषार असता तर त्याच्या भरवस्यावर नसत पाठवलं माझ्या मुलीला बाहेर....
(हे सर्व तुषार ऐकतं होता, त्याच्या मित्राने लगेच स्पिकर ऑफ केला आणि बाहेर बोलायला गेला.)
-----प्रसंग दुसरा-----
काही दिवसानंतर तुषार आणि त्याचा दुसरा मित्र ती मैत्रीण ज्या ठिकणी राहते त्या भागात गेले होते. तर सहज आलोच आहोत इकडे तर मैत्रिणीच्या घरी जाउन यावं म्हणून कॉल केला तर मैत्रीण बोलली घरी ये आई पण आहे खूप दिवस झालेत भेटलोही नाही त्यानिमित्ताने बोलणंही होईल. मग तुषार आणि त्याचा मित्र त्या मैत्रिणीच्या घरी पोहचले. मग खूप गप्पा सुरु झाल्या. मैत्रिणीची आई तुषारच्या मित्रांसमोर तुषारच जरा जास्तच कौतुक करत होती . तुषार कसा आमच्या कुटुंबातील सदस्य आहे वगैरे वगैरे खूप काही. २-३ तास गप्पा रंगल्या यानंतर तुषार आणि मित्र बाहेर पडले. त्यानंतर तुषारचा मित्र खूप प्रभावित झाला आणि तुषारला बोलला कि, "खरचं यार तुझ्या मित्र मैत्रिणी खूप छान आहे त्यात तुझा त्यांच्या घरच्या व्यक्तींसोबतच नातं खूप छान आहे, किती तुझ्यावर घरच्यासारखं प्रेम करतात ." यावर तुषार फक्त हो...हो...उत्तर देत होता कारण त्याला खरं काय ते सतत डोळ्यासमोर येत होत. त्याला तर कॉलवरच बोलणं आठवत होत.
आजही तुषारला त्या मैत्रिणीच्या आईला हे सांगायचं आहे कि, काकू तुमचा तो फोनकॉल मी ऐकला आहे.तुमचं माझ्या मगच बोलणं ही मी जाणून आहे. कारण तुषार आजही हे बोलायचं धाडस करत नाही कारण त्याला असलेले नातं तोडायचं नाही म्हणून तो आजही हे बोलणं टाळतो आहे. तुषारच्या या अनुभवावरून कोणतंही नातं जोडताना जसं भावतं, जितकं भावत तितकंच जोडावं आणि दाखवावं. वास्तवाच्या जास्त पलीकडे जाऊन दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते उघड पडतं आणि मग त्यातील कृत्रिम ओलावा दिसून येतो.
-स्वप्नील मानव©

Comments
Post a Comment